Archive for सामाजीक

माझा न्युनगंड !

प्रसाद नागेश घाडी – १८ वर्षे वयाचा – इरिव्हर्सीबल मस्कुलर ऍट्रोफी / डायस्ट्रोफी (मराठीतले नांव सोडा – मला उच्चारही माहीत नाही !) ह्या दुर्धर आजाराने व्यस्त झालेल्या एका अश्राप जीवाची कथा आज रात्री ११ ते ११.३० च्या मध्ये सह्याद्री वाहिनीवर बघीतली व त्याच्या बद्दल आपणांस चार शब्द कळवल्या खेरीज राहवले नाही.

p1904200151.jpgह्याला मी सर्वप्रथम बघीतला तो “आता खेळा नाचा ” ह्या नक्षत्रांचे देणे ह्या कार्यक्रमात मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात. त्या वेळी त्याचे वय असावे १४/१५- परंतू आज त्याला परत बघताना ह्या मुलाने माझ्यातला ‘मी’ पणाचा नक्षा साफ उतरवून टाकला.
दहावीच्या परिक्षेत (आपल्या विरूद्ध असलेल्या सर्वच परिस्थितींत) ८६% गुण मिळवणे हे मलाही माझ्या वेळी शक्य झाले नव्हते.

“दहावीचे वर्ष मला फार कठीण गेले, पुस्तक सारखे हातातून गळून पडायचे. मी खुप आजारी पडलो, तरी त्याही परिस्थितींत मी मन लावून अभ्यास केला” हे वाक्य वाचून मला ज्या सुविधा मिळाल्या व ज्या परिस्थितींत मी दहावी पास केली त्याची आठवण झाली.

२००० चा नेहरू राष्ट्रीय बालश्री पुरस्कार, राजीव गांधी ऍवार्ड, चैतन्य आर्टचा पुरस्कार, केव्हीन केअर ऍबीलीटी पुरस्कार हे व असे अनेक पुरस्कार प्राप्त हा मुलगा काय करू शकत नाही ते विचारा.
प्रसादचे गाणे मी प्रत्यक्ष ऐकलेच होते, संपूर्ण शरिरातली शक्ती हातात एकवटून तो चित्रेही काढतो, बुद्धीबळ खेळतो व कविता करतो. त्याच्या चित्रांचे भेटकार्ड बाजारात आल्याचे पाहून समाधान वाटले. कृणाल कॅसेट्स च्या श्री. विरा ह्यांनी त्याच्या गाण्यांची कॅसेटही काढली आहे.
प्रसादचे वडिल श्री. नागेश घाडी हे एका म.न.पा.च्या इस्पितळात सुरक्षा रक्षक असल्याचे वाचनांत आले होते. आई सौ. शरयु घाडी ह्या पण नोकरी करतात.
“आम्हीच त्याचा उत्कृष्ठ सांभाळ करू ह्याची खात्री असल्यानेच देवाने त्याला माझ्या पोटी जन्म घातला असावा. मी त्याची आई आहे ह्याचा मला अभिमान वाटतो” ह्या शब्दांत त्यांनी स्वतःचे मनोगत सांगीतले.

“माझ्या यशातला १०% वाटा माझा तर ९०% वाटा माझ्या आई-वडिलांचा आहे” हे तो इतक्या विनम्रपणे सांगतो की आपला उर भरून येईल.
प्रसाद बद्दल श्री. परेश मोकाशींनी एक सुरेख उदाहरण दिले – अदिती ह्या देवतेच्या आठ पुत्रांपैकी प्रथम सात पुत्र धडधाकट होते परंतू आठवा पूत्र कमकुवत होता, परंतू तोच सुर्य झाला.
“माझ्या सारख्या इतर मुलांच्या आई-वडिलांना माझा हाच संदेश आहे की, मी कठीण परिस्थिंशी सामना करून जे करू शकतो ते काही अपंग मुले कदाचीत करणार नाही परंतू त्यांना त्याचा प्रयत्न केल्याचा खरा आनंद लाभु द्यावा” असा संदेश त्याने दिला.
कुमार केतकर म्हणतात ते खरे आहे, “आपल्या सारख्याला न्युनगंड वाटावा असे प्रसादचे चरित्र आहे” 

धिरोदत्त प्रसाद घाडीला त्याच्या भावी जीवनांत सर्व परिस्थितींशी धडधाकट मनोवृत्तीने तोंड देण्यासाठी अनेक शुभेच्छा !
  

टिप्पणी करे

“आनंद~यशवंत”- वृत्तांत

मराठी गीत व संगीतकार श्री.यशवंत देव ह्यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त हृदयेश आर्ट्स तर्फे त्यांचा हृद्य सत्कार समारंभ शनिवार-१९नोव्हे. रोजी पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात संपन्न झाला – त्याचा हा वृत्तांत.

श्री. प्रदीप भिडे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन ठीक ८ वा. सुरू करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

तनुजा वैद्य-जोग ह्या श्री.देवांच्याच शिष्येने ‘तुळशीच्या बनी’ ह्या देवांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तिगीताने सुरुवात करीत ‘तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट’ हे भावगीत पाठोपाठ सादर केले. मंगेश पाडगावकरांच्या नव्या कोऱ्या येऊ घातलेल्या काही भावगीतांपैकी ‘सांग कुठे भुलला ग राधे तुझा श्याम’ ह्या गीताने तनुजा वैद्य जोगांनी ह्या कार्यक्रमातील स्वतःच्या सहभागाची सांगता केली.

तत्पुर्वी श्री. भिडे ह्यांनी श्री.यशवंत देवांनी प्रचलित केलेल्या “समस्वरी” ह्या गीत प्रकाराबद्दल गमतीदार माहिती सांगितली. ‘सांग कुठे भुलला’ च्या आधी तनुजा ह्यांनी “समस्वरी” प्रकारातले एक गीत सादर केले. हिंदीतल्या “जवाँ है मुहोब्बत-” च्या चालीवर मराठीत “मी जाते माहेरी, गुंडाळून गाशा. नको ती भांडणे, नको तो तमाशा” हे गीत सादर करताच सभागृहात हास्याचा धबधबा कोसळला.

मी इयत्ता ७वीत असताना गिरगांवच्या देशस्थ यजुर्वेदी माध्यांदीन ब्राह्मण सभेच्या सभागृहात श्री. यशवंत देवांनी सादर केलेल्या मराठी “समस्वरी” ची आठवण प्रकर्षाने आली.
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” वरील समस्वरी त्यांनी “चौपाटीच्या बाकावरती वचन दिले तू मला” असे केल्याचे मला अजूनही आठवते. 

जवळपास १५०० गीतांना चाली देऊन संगीतबद्ध करणाऱ्या श्री.यशवंत देवांबद्दल बोलताना भिडे कौतुकाने (नारदाची गोष्ट संगत) म्हणाले की, मुंबईतल्या शिवाजी पार्कचे हे देव यशवंतही आहेत व आनंदही आहेत.

पाठोपाठ माधुरी करमरकर ह्यांनी रसिक मनाचा ताबा घेतला तो देवांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘जीवनांतली घडी अशीच राहू दे’ ह्या आजवरच्या लोकप्रिय गीताने. ‘विसरशील खास मला’ ह्या त्यांच्याचं गीताला मिळालेला श्रोत्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त होता. माधुरी ह्यांनीही “समस्वरी” ह्या प्रकारातले देवांचे “ओह सजना, बरखा बहार आयी” वरील “ही बघ ना नटून थटून सांज आली” हे गीतही रसिक वर्गाची वाहवा घेऊन गेले.
माझे आवडते कवी श्री. मंगेश पाडगावकर ह्यांची खास उपस्थिती मनाला सुखावून गेली. त्यांनी श्री.देवांच्या गौरवापर छोटेखानी भाषण केले.श्री. यशवंत देवांनी त्यांच्या कित्येक गीतांना चाली दिल्या व ती गीते अजरामर झाली ह्याची आठवण करीत देवांच्या १००व्या वाढदिवसाचा कार्यक्रम येथेच पार पडो व मी व आपण रसिक वर्ग त्या कार्यक्रमाला उपस्थित राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. फक्त “आनंद यशवंत” हे नाव असलेल्या ह्या कार्यक्रमातला “देव” हरवू देऊ नका- असेही त्यांनी यशवंत देवांना सुचविले.निर्व्यसनी देवांचे कौतुक करताना ” हा असा संगीतकार आहे जो दारू पीत नाही, सिगरेट ओढत नाही व तंबाखू खात नाही” हे आवर्जून सांगितले.

“प्रेम करणाऱ्याने प्रेम कधी तराजूत तोलू नये व गायनाच्या कार्यक्रमात भाषण देणाऱ्याने जास्त बोलू नये.” असे सांगत त्यांनी भाषणाची पूर्तता तर केली पण जाण्यापूर्वी त्यांनी-

“मी आज ७५ वर्षांचा, देव आज ८० वर्षांचे तर श्री.गजानन वाटवे (उपस्थित होते) आज ९० वर्षांचे आहोत. आमचे सत्कार समारंभ होत असताना आम्ही थरथर कापत कोणाच्या तरी हातांचा आधार घेत मंचावर येतो त्याचा अर्थ आमची प्रतिभा, आमची गायकी वा आमची मराठी कोणाच्या आधाराने चालणार किंवा पुढे सरकणार असा घेऊ नये” हे सुनावताच श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. ” ही मराठी आपल्या स्वत:च्या पायावर उभी राहणारी आहे व तिला कुठल्याही हाताची गरज नाही” हे टाळ्यांच्या गजर संपल्यावरचे वाक्य अधिक टाळ्या घेऊन गेले.
श्रोतवृंद श्री. पाडगावकरांच्या बोलांत मंत्रमुग्ध असतानाच श्री.श्रीधर फडके ह्यांनी मंचाचा ताबा घेतला – स्पष्ट व साध्या मराठीत “नमस्कार” असे रसिकांना वंदन करीत त्यांनी “देव काकांना मी घरातल्या समोरच्या खिडकीत बसून वहीत काहीतरी लिहिताना बघत असे”.”त्यांची मला खूप भीती वाटे” “त्यांनीच मला सर्वप्रथम गाण्याची संधी दिली व तू सुधिर फडकेंचा मुलगा आहेस हे लक्षात ठेवून गाणे गा असेही बजावले” ह्या व अशा कित्येक आठवणी श्री.देवांबद्दल सांगितल्या.

कै. सुधीर फडके (बाबूजी) ह्या माझ्या आवडत्या गायकाचे गाणे प्रत्यक्ष बघण्याचे सौभाग्य मला कधी लाभलेच नाही परंतू श्रीधर फडकेंनी हुबेहूब त्यांच्याचं आवाजात जी गाणी सादर केली त्यांतूनच माझी दुधाची तहान मी ताकावर निभावून नेली.

मग सुरू झाली खऱ्याखुऱ्या आवडत्या भावगीतांची पर्वणीच श्री. देवांनी संगीतबद्ध केलेले व बाबूजींच्या स्वरातले “तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे” श्री.दिलीप पांढरपट्टे ह्यांच्या ‘घन बरसे’ मधील “आई असते शांत…..”कधी बहर- कधी शिशिर-” मागोमाग अजून एक छान गाणे- “काही बोलायचे आहे पण बोलणार नाही” ह्या गीताने श्रीधरने स्वत:च्या सहभागाचा समारोप केला.

श्रीधर फडके नंतर उत्तरा केळकरांनी अष्टपैलू गीतांचा गालिचाच रसिकांसमोर उलगडला. बहिणाबाईंच्या – यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेल्या – “जाय आता पंढरीले” ही ओवी व “खोप्या मंधी खोपा सुगरणीचा चांगला…..” ही ओवी सादर केली. विं दा करंदीकरांचे ४ वेगवेगळ्या चाली एकत्र असलेले “सर्वस्व तुजला वाहिले” ह्या कठीण भावगीतानंतर आली मऱ्हाट् मोळी लावणी….. “माघाची थंडी माघाची…..” ह्या लावणीला संयमीत पार्लेकरांनी शिट्ट्या व टाळ्यांनी सभागृह डोक्यावर उचलून घेतले व आपणही खरे ‘मऱ्हाटी’ असल्याचेच दाखवून दिले.
ज्या गीतांसाठी मी तासभर तर सोडाच,…. दिवसभर रांगेत उभे राहून प्रवेशिका मिळवण्यास तयार होतो त्या गायकाची मी उत्सुकतेने वाट पाहतं होतो. श्री.अरुण दाते ह्यांचे मंचावरील आगमन सर्वांनीच टाळ्यांच्या गजरांत केले. “मी पाहिले वाहिले व त्यानंतरही सर्वाधिक गाणी श्री. यशवंत देवांचीच म्हटली आहेत” असे संगत श्रीनिवास खळे ह्यांचे १९६३ मधले “शुक्रतारा मंदवारा” हे गीत यशवंत देवांनीच संगीतबद्ध केल्याची आठवण करून दिली. “कविता चांगली नसेल तर गीत कधीच अजरामर होत नाही व टिकून राहणार नाही” असे संगत त्यांनी श्री.यशवंत देवांची व समोर बसलेल्या आशा भोसलेंची स्तुती केली. आशा भोसलेला “फिट्ट” बसणारे गीत – “दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे” हे सादर केले. त्या पाठोपाठ सुरू केलेल्या “अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी- लाख चुका असतील केल्या; केली पण प्रीती” ह्या गीताला सुरुवातीलाच टाळ्यांचा कडकडाट झाला. “जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे, आपले आनंद गाणे गायचे आहे” ह्या देव व दाते ह्यांच्या येऊ घातलेल्या नव्याकोऱ्या भावगीता पाठोपाठ दोघांचे सर्वोत्कृष्ट व सुप्रसिद्ध “भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी” हे सादर झाले.
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या माझ्या आयुष्यातल्या सर्वांत आवडत्या गीताने श्री. दाते ह्यांनी ह्या संगीत समारंभाची सांगता केली हे माझे सुदैव !
त्यानंतर मध्यांतर झाले.

मध्यांतरानंतर श्री.यशवंत देव, सौ.करुणा देव, श्री.गजाननराव वाटवे व श्री.गजाननराव सुखटणकर ह्यांचा आशा भोसले ह्यांच्या हातून सत्कार करण्यात आला. मऱ्हाटमोळी पगडी देऊन श्री.यशवंत देवांवर छतातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

नंतर सुरू झाली आशा भोसलेंशी अनौपचारिक गप्पांची मैफील त्याचा सारांश –

आशा- मराठी बोलण्याची मला सवय थोडी कमी आहे कुठे चुकले तर मोठ्या मनाने क्षमा करा
आशा- खरे ब्राह्मण हे असे असतात (देवांकडे हात दाखवून) पगडी त्यांना अगदी शोभून दिसते- इतरांनी पगडी घातली तर ती चांगली दिसत नाही.
आशा- मला पगडी घालण्याची खूप इच्छा आहे पण कोणी घालतच नाही आता मी विश्वासला (हृदयेश आर्ट्स चे) सांगणार आहे तू नेहमी मला टोपी घालतोस पुढच्या कार्यक्रमाला मला पगडी हवी.
आशा-ग्रॅज्युएशनची टोपी घालण्याची मला खूप इच्छा होती पण मी फक्त ४थी ५वी शिकलेली – पण ही इच्छा एका गीताने पूरी केली व मला ग्रॅज्युएशनची टोपी घालायला मिळाली. ती टोपी घालूनच मी स्टेजवर गाणे म्हटले कारण भीती वाटत होती, त्यांनी ती परत दिलीच नाही तर ? 
देव- वाटव्यांवरील कविता वाचून दाखवत- वाटवे हे मराठी भावगीतांचे गेटवे आहेत.
आशा- वाटव्यांच्या भावगीत म्हटल्याने मी माईंच्या हातचा मार खाल्ला आहे (राधे कसा गं सैल झाला तुझा अंबाडा ह्या गीताचे ध्रुपद ऐकवून)
 आशा- (टीव्ही वरील मुलाखतकार बायकांच्या हुबेहूब नकला करून खूप हसवले.) ह्या मुलाखती घेणाऱ्यांनी त्या व्यक्तीचा फोटो ठेवून मुलाखत घेतली तरी चालेल अशा मुलाखती घेतात. 
आशा- आपण सर्वप्रथम केंव्हा भेटलो ह्याची आठवण करून दिली – परत एकदा “विसरशील खास मला दृष्टीआड होता” ह्या गीताचे एक कडवे दोघांनी सादर केले
आशा- फडके व देव हे दोघेही सारख्या ताकदीचे संगीतकार- ह्यांच्या बरोबर काम करायचे म्हणजे माझी मधल्या मध्ये पंचाईत व्हायची. फडके दाबून गाणारे तर देवांना मनमोकळे व आवाज न चोरता गाणे आवडायचे.
आशा-(बाबूजींची हुबेहूब नक्कल करीत) फडके असे गात – ह्या नंतर बाबूजींच्या आठवणी आशाने व्यक्त केल्या.
देवांनी ढगाला लागली कळ वर एक विडंबन(राजकारणावर)काव्य सादर केले “राजकारणात साचलाय मळ – त्याची भोगतोय फळ ”
ई-टीव्ही वर शिघ्रकाव्य बसल्या बसल्या केल्याची आठवण देवांनी सांगितली आम्ही मुलींशी बोलण्यासाठी महिनो न महिने घ्यायचो तर आजकालची मुले सरळ ‘आती क्या खंडाला’ असे म्हणतात हे साम्य रिमिक्स चे व जुन्या गीतांचे असल्याचे देवांनी सांगितले.
रिमिक्स मुळे बेरोजगारी कमी झाल्याचे श्री. देव उपहासाने म्हणाले- जेथे फक्त तबला पेटी व तंबोरा ह्या निवडक वाद्यांवर आम्ही गाणे ऐकवले आहे तेच गाणे आज १२/१५ पोरं वेगवेगळी वाद्ये वाजवत,कॅमेरा सोबत सादर करतात. संगीत श्रवणीय वरून प्रेक्षणीय झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
असतील नसतील (जास्त करून नसतील) तेव्हढे तोकडे कपडे घालून आजचे संगीत सादर केले जाते ह्याविषयी श्री. देवांनी खंत व्यक्त केली.
आशाच्या गायकीचे अमाप कौतुक श्री.देवांनी ह्यावेळी केले. स्वतःची एक शैली त्यांनी कायम ठेवल्याचे आवर्जून सांगितले. अनुकरण व अनुसरणं ह्यावर त्यांनी ह्या निमीत्ताने उदाहरण दिले. “जेवताना समोरचा काटा चमच्याने जेवतो म्हणून मी त्याचे बघून काट्या चमच्याने जेवलो ते अनुकरण पण मी माझ्याच ताटातले जेवलो ते अनुसरणं.”
देवांनी आशावर सुंदर कविता सादर केली.
आशा- “एका गाढवाच्या मालकाने पैज लावली होती की, ह्या गाढवाला मी नाही ह्या अर्थीचे काहीच शिकवले नाही तो प्रत्येक गोष्टीला होकारच देतो- मी ती पैज जिंकली… फक्त गाढवाच्या कानांत जाऊन विचारले की पॉप रिमिक्स गाऊ का व पैज जिंकली.”      
आशा-देवांनाः खर सांगा; दिदी व मी ह्यांत तुम्हाला कोणाचे गाणे जास्त आवडते ? 
देव- लताची गाणे म्हणण्यामागची आत्मीयता व ती स्वतःला वाटेल तेच गाते पण वाट्टेल ते गात नाही हे सांगितले
आशा- मला जे मिळेल ते गाणे मला म्हणावे लागले कारण माझी परिस्थिती तशी होती. मला मुले होती व त्यांच्या संगोपनाची व ग्रॅज्युएटच्या टोपीची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून जे समोर येईल ते गाणे मला घ्यावे व गावे लागले.
आशा- आजही गाण्याची मला गरज आहे कारण आज गाणे हा माझा श्वास आहे व मी स्वयंपाक करीत असतानाही गाणे गाते. गायल्या शिवाय मी जिवंत राहूच शकत नाही.  
श्री. देवांनी पाडगांवकरांची एक गमतीदार कविता सादर केली. “कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आले पिल्लू….”
त्यानंतर “संथ वाहते कृष्णामाई” वर एक विडंबन गीत त्यांनी सादर केले- “संथ गातसे कृष्णाबाई,गीतांमधल्या सुर तालांची जाणीव तीजला नाही” 
“मरण येणार म्हणून कोणी जगायचे थांबेल का ” हे पाडगांवकरांचे बोलगीत श्री. देवांनी सादर केले.
आशा- मी आपल्या ८५,९०,९५,१०० ह्या वाढदिवसांना येत जाईन 
देव- पंचवार्षीक योजना दिसतेय तुझी ! (हशां व टाळ्या) पण तोवर मी जगलो तर. 
आशा- माझे नांव आशा आहे हे विसरू नका !
ह्या संवादाबरोबर टाळ्यांच्या कडकडाटात ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.

अत्यंत घरगुती वातावरणांत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका विनामुल्य सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत उपलब्ध असल्याची जाहिरात वाचून मी ८ वाजता पोहचलो. जेमतेम दोन पत्रिका मीळाल्या, त्याही रांगेत तासभर वाट पाहिल्यावर !
पण असे कार्यक्रम बघायला मिळाल्यास दिवसभर रांगेत उभे राहण्याची तयारी आहे-

टिप्पणी करे

“साहेब” !

दूरचित्रवाणीची ‘आजतक’ वाहिनी सुरू केली. नित्यनेमाप्रमाणे समोर जाहिराती बघताच टीव्हीचा आवाज बंद केला व मूक जाहिरातींचा आस्वाद घेता घेता जेवण सुरू केले…. इतक्यात ‘वाजपायी’ महोदय (अटलजी नाही, वृत्तनिवेदक !) आले म्हणून आवाज वाढवला- कोणत्यातरी नायका बद्दल ते काहीतरी बोलत होते. सचित्र निवेदन ऐकू आले, नायक म्हणजे श्रीमान दया नायक ह्यांच्याबद्दल सांगितले व दाखवले जात होते.

‘अब तक छप्पन्न’ चा खराखुरा ‘नायक’, दयाला त्या वाहिनीवरच्या चित्रफितीत रडताना पाहिले. सिनेमांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास ‘सब मगरमछ के आसू’ होते.

चहाच्या टपरीवर काम करणारा पोऱ्या, खूप मेहनतीने रात्रीचा दिवस करून शिकला व पोलीस खात्यात भरती झाला होता म्हणे….. साहजिकच जेंव्हा तो नवा ‘नायक’ झाला तेंव्हा मुंबईकरांना त्याचे कोण कौतुक वाटले. पेपरांत रकानेच्या रकाने भर-भरून वर्णने यायची. लोकल गाड्यांत हिरीरीने ‘मी दया नायकला कुठे बघितला आहे’ ते सांगितले जायचे. आमच्या इमारतीतला बोल-बच्चन कल्पेश तर त्याच्या ‘एन्कॉन्टर्स’ चे असे काही रसभरित वर्णन करायचा की, स्वतःच तेथले सगळे नुकतेच ‘आवरून’ आला आहे !

आज महारथी लाचार दिसत होते…. थोडा वेळ रडण्याचे नाट्य बघितल्यावर उबग आला म्हणून वाहिनी बदलली व पुढे सरकलो तर काय…. नानाचा ‘ अब तक ५६’ लागलेला होता. ‘त्या’ नाट्यापेक्षा ‘हे’ नाट्य बरे म्हणून तहान-भूक न विसरता व जेवता जेवता त्या सिनेमातले किलो किलोंचे भारी डायलॉग्स ऐकले ! पोट गच्च भरल्यावर मग कुठे डोकं चालायला लागले…..

वृत्तनिवेदकाने काही प्रश्न बघणाऱ्यांवर सोडलेले होते. माझ्या मनात विचार आला, आईच्या नावाने शाळा, बापाच्या नांवाने दवाखाने किंवा अमक्या ढमक्याच्या नांवे पाणपोया सुरू करणे व स्वतःची पापे त्या पुण्याच्या कल्पनेखाली दडपून टाकणे आजकाल किती सोपे झाले आहे ना !
एका भाईची माणसे टपकवायची व दुसऱ्या भाई कडून ‘चंदा’ गोळा करण्याचा ‘धंदा’ करायचा…
एखाद्या सिने नटाला/निर्मात्याला धमक्या आल्या (त्यातही स्वतःचा कार्यभाग असणारच !) की, त्याला संरक्षण देण्याच्या नावाने खंडणी वसूल करायची….
किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला (माणिकचंद/जोशी वगैरे) अटक झाली की “थर्ड डिग्री” लावू नये म्हणून खिरापती गोळ्या करायचा……   
इतके झाल्यावर ५०% मात्र ‘वर’ पोहचवायचे मग शाळा तर काय, मेडिकल कॉलेजही सुरू करता येईल की !

पण ज्या मातेच्या नावाने ही शाळा उघडली गेली आहे तिचे म्हणणे काय असावे ? अशा अप्रामाणिक पणे जमा केलेल्या ‘माये’ने उघडलेली त्या ‘माये’च्या नावाची शाळा शिक्षण ते काय देणार ? व हे ‘नायक’ साहेब मुलांच्या स्नेहसंमेलनाला तेथे गेल्यावर मुलांना उपदेश तरी काय करणार हे विचार मनांत आल्याशिवाय राहिले नाहीत.   

 दुसऱ्या एका ‘साहेबां’ना असेच एका वाहिनीवर बघितल्याची आठवण झाली. साहेबांच्या अंगात चक्क ‘राधे’ने प्रवेश केला होता व डी.आय.जी. साहेब कृष्णाच्या भक्तीत असे काही तल्लीन झाले होते की त्यांना स्वतःचे व नेसलेल्या साडीच्या पदराचेही भान उरले नव्हते.(पगार मात्र खात्यातून बरोबर काढून घ्यायचे-)…
एका चित्र वाहिनी वर दाखवलेल्या दृश्यात ह्या ‘साहेब’रुपी राधेला गोपीकांनी असे काही वेढून टाकलेले दाखवले होते की, खुद्द कृष्ण आला तर त्यालाही ‘साहेबां’चा हेवा वाटेल! साहेबांचे वागणे, चालणे, बोलणे ह्यावर राधेचा इतका प्रभाव पडलेला होता की, त्यांच्या सर्वांगावरून साहेब म्हणजे ‘राधे’चेच रुपडे आहे असेच कोणालाही वाटावे !
हातात बांगड्या….
डोळ्यांत कजरा…..केसांत गजरा…..
नाकात नथनी, डोईवरून ओढणी व कानांत डूल…. असे हे ‘साहेबां’चे साजीरे गोजिरे रुपडे प्रत्यक्ष ‘राधे’लाही ‘लाजवणारे’ होते !

ह्या ‘साहेबां’ना, सॉरी ‘राधे’ला, काही दिवसापूर्वी त्यांच्या अनुयायांनी रंगमंचावर स्थानापन्न केल्याचे चित्रीकरण बघण्यात आले. “कार्यक्रम” उरकल्यावर ‘राधे’चा ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली. “चारो तरफ कन्हैय्या – बीच में राधा” अशी उलटी अवस्था होती. त्यात बिचाऱ्या एका भक्ताचा ‘धक्का’ लागला राधेला !
धक्का नेमका चुकीच्या जागी, चांगलाच जोरदार लागला असावा ! बघता बघता राधेतला ‘साहेब’ जिवंत झाला….. व फाडकन् भक्ताच्या श्रीमुखांत भडकवली साहेबांनी ! भक्त महाशय बिचारे गोंधळले असावेत ‘आशीर्वाद’ मिळण्याऐवजी डायरेक्ट ‘प्रसाद’च खावा लागलेला होता !

साहेब पुनश्च ‘राधा’ झाले की नाही हे त्या गोंधळात वृत्तनिवेदक सांगायलाच विसरला (न जाणो आपल्यालाही ‘प्रसाद’ मिळेल ह्या भितीने !) परंतू एक मात्र चांगले झाले…. गर्दीत पुरुषांचे धक्के कसे खावे लागतात ते त्या ‘राधा’रुपी साहेबाला बरोबर कळले होते !

‘बिगर दॅन लाईफ’ असली प्रतिमा रंगवलेले आपले प्रतापी ‘साहेब’ लोक व त्यांच्या भोवती गोळा झालेले प्रशंसक/अनुयायी पाहिल्यावर आपणही ‘साहेब’ व्हावे असे एखाद्या हवालदाराला न वाटल्यास नवल ते काय ?

पोलीस खात्याचा ऱ्हास बघत दोघे भाई मात्र गालातल्या गालात हसत असावेत !

टिप्पणी करे

आवाज….!

आवाजआवाज….. आणी आवाज……रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेकविध आवाजांचे प्रत्यंतर घेत असतो….

प्रत्येकाची सकाळ सुरू होते ती वेगळ्या रितीने-
माझी सकाळ रात्री लावून ठेवलेल्या गजराने होते. पहाटे (म्हणजे वा.)
बिछान्यांतून उठून देवाला नमस्कार करण्यासाठी लावलेल्या दिव्याच्या बटणापासून ते रात्री मालवलेल्या दिव्याच्या बटणांचे आवाज इतक्या वर्षांपासून कानांवर पडून पडून चांगलेच ओळखीचे झालेत.
खाली बालदीतल्या पाण्यातफताककरून येणारा कपड्याचा आवाज ऐकला की तंबी गाड्या धुतोय हे ओळखावे ! पत्नीची झोप मोडता बाथरुममध्ये जाऊन आलो की, फ्लशचा आवाजफिरायला जायचे कपडे बदलताना उघडलेल्या कपाटाचा/ड्रॉवरचा हळुवार आवाज, शूज घालताना कितीही काळजी घेतली तरी होणाऱ्या धडपडींचा आवाज….. कधीतरी बरोबरीच्या मंडळीपैकी एखादा फिरायला येणार नसेल तर त्याने भ्रमणध्वनीवर पाठवलेल्या लघूसंदेशाचा शांतता भंग करणारा आवाज…..

घरातून चालताना येणारा स्वत:च्याच पायांचा आवाज; जिना उतरताना होणारा आवाज मग खाली गेल्यावर सायकली स्टँडवर लावून बरण्यांची दणादण आपटा आपटी करणाऱ्या दूधवाल्यांचे आवाज….. सोबतीला मंद घरघर करणारा सोसायटीच्या पाण्याच्या पंपाचा आवाज हे दिवस सुरू करतात.

आजकाल त्यात हरवलेले शोधूनही सापडणारे पक्षांचे किलबिलाटगाई वासरांच्या हंबरण्याचे त्यांच्या गळ्यांतल्या घंटीच्या किणकीणाटांचे आवाज, कुठेतरी दूरवर वाजलेल्या मंदिरातल्या घंटेचा मधुर स्वर…. बैलगाडीच्या चाकांचे आवाज, सडा टाकताना येणारा आवाज ह्यांची आठवण येते.

फिरायला गेल्यावर जिमच्या जॉगींग ट्रॅकवर लावलेल्या संगीताचे आवाज
त्यात मिसळल्या गेलेल्या गुजरात्यांच्या बोंबाबोंबीचे आवाज…..
नेमक्या दोन/तीन बायका जर पुढे किंवा मागेवॉकघेत असतील तर त्यांच्या घरगुती गप्पांचे (टॉकचे) आवाज
फिरून येताना बसमध्ये चढणाऱ्या चिल्ल्या पिल्यांचा किलबिलाटमध्येच शाळेत जायचे नसलेल्या एखाद्याचा रडका स्वर; त्याच्या आईच्या समजूत घालण्याचे आवाज,
कंडक्टर ने शाळेच्या बसच्या दाराशेजारी उभे राहून पत्र्यावर मारलेल्या थापेचे आवाज हे नित्याचे चांगलेच ओळखीचे झाले आहेत.
कुठेतरी एफ.एम.वरून येणाऱ्या जाहिरातींचे आवाज…. घरी पोहचल्यावर बायकोने चहाचे आदण चुलीवर ठेवल्याचा (आवडता) आवाज; चहा उकळून वर आलेला आवाज….
मुलींचा उठल्या उठल्यामी आधी, मला आधीचा स्वर…. त्यावर तारसप्तकांत ओरडणाऱ्या सौ. चा आवाज…..हे एखादं दिवस नसले तर रविवार असल्याचा भास मला होतो….

दिवस वर चढत असतो…. भ्रमणध्वनीच्या वेगवेगळ्या स्वरांतून मित्राचा, नातेवाईकाचा की क्लायंट्स चा नेमका कळलेला सुरदाढी करताना ब्लेड गालावरून फिरल्याचा आवाज, शॉवरखाली मोठमोठ्यांनी पाढे किंवा कविता म्हणणाऱ्या मुलीचा आवाज, अंघोळ करताना स्वत:चा स्तोत्र गुणगुणल्याचा आवाज, देव्हाऱ्यासमोर उदबत्ती लावताना पेटवलेल्या काडीचा आवाज, घंटीचा स्वर….. हे रोजचे येणारे आवाज तर साथीला असतातच त्यात अजून काही विशेष आवाजांची भर पडत असते…..

एखादं दिवस बाहेर रस्त्यावर आलेल्या कडकलक्ष्मीच्या आसुडांचा आवाज, ‘लिक्विड गाडीअशी बोंब मारणाऱ्या साबू विक्याचा आवाज, भोंपू भोंपू असा आवाज करीत सायकलवर जाणाऱ्या इडली विक्याचा आवाजमध्येच घरात वाजलेल्या डोअर बेलचे आवाज….. मोलकरणीने भांडी घासायला सुरुवात केली की होणारे आवाज….

स्वत:च्या कायनॅटिक ला मारलेल्या भरपूर लाथांचे आवाज ह्या सर्वांची सोबत घेतट्रॅफिक मधून येणारे विविध आवाज ऐकत…. क्लायंटकडे पोहचलो की तेथल्या रूग्णांचे विव्हळण्याचे आवाज…. आय.सि.यू तल्या व्हेंटीलेटर्स चे आवाज, बेडसाइड मॉनिटर्सचे बीप्स, मध्येच आलेला स्वत:च्या खाकरण्याचा आवाजएखादा प्रॉब्लेम सुटला नाही तर स्वत:शीच काढलेले स्वर…. सुटला तर समाधानाने सोडलेल्या सुस्काराचा आवाज, बॅंकेतल्या एटिएम च्या नोटा मोजल्याचा आवाजत्या पाठोपाठ स्टेटमेंट प्रिंट केल्याचा आवाज….

ह्यातले बरेचसे आवाज आपल्याला सांगताही ओळखता येऊ लागले आहेत.

आवाज की दुनिया येथेच थांबत किंवा थकत नाही तर लोकलच्या धडधडीचे आवाज, ‘मच्छी….’ करीत मारलेली आरोळीडबेवाल्याच्या साखळीचे आवाजट्रॅफिक पोलिसाने वाजवलेल्या शिट्टीचा आवाज….. सिग्नल हिरवा झाला की पिक अप घेणाऱ्या वाहनांचे आवाज….. कुठेतरी जोरात ब्रेक मारल्याचा कर्कश आवाज….. कोणाच्या रिव्हर्स हॉर्न चा आवाज….

ह्या सगळ्यांची कमतरता भरून काढतात ते संगणक किंवा वातानुकूलित यंत्रांचे आवाज…. फॅक्टरीतून येणारे विविध यंत्राचे आवाज हे शहरांतल्या प्रत्येकाचे जीवनच झाले आहे…. रात्री दहा नंतर स्पिकर्सवर फटाक्यांवर बंदी आली म्हणून नाराजी दर्शवणाऱ्या विविध लोकांनी ह्या आवाजांचे विश्लेषण करायला हवे…. मनोज कुमारचा एक सिनेमा होता… ‘शोरनावांचा त्याची आज आठवण झाली….. पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या वैभवला लहानपणापासून ह्या आवाजांची ओळखच झालेली नाहीबाबांनी आणून दिलेले माकड झांजा आपटते नाचते इतकेच त्याला दिसते फक्त दिसते! दहानंतर स्पिकर्स लावा की दिवसभर फटाके फोडा…. वैभवला त्याच्याशी काही देणे घेणे नाही… ‘आवाज हळू करअसे टीव्ही बघताना त्याला कोणीच सांगत नाही….. आपणच ठरवावे सुखी कोण ?

टिप्पणी करे

चूल आणी मूल

चूल आणी मूल हा विषय आहे माझ्या आजीच्या वेळचा !माझी आजी ठार बहिरी(७५% वैगुण्य) होती…. फक्त ओरडलेलेच काय ते कळायचे !
मला चांगलेच आठवते, लहानपणी आम्ही मुद्दाम काहीही न बोलता फक्त तोंड हालवायचो, मग आजी पण ‘काय? काय?’ करींत एक हात कानामागे कर्ण्यासारखा ठेवून ऐकण्याचा प्रयत्न करायची. मामांची पोरं, मावशीची पोरं व मी जबरदस्त हसायचो. वाटायचे कशी आजीची गंमत केली !

मोठे झाल्यावर कळले की तीला सगळं समजायचे – आईने सांगितले – “तीला माहित असायचे की, तुम्ही पोरं तीची टेर खेचताहात ते !”
“कसें काय ?” 
आई:” ती म्हणायची – एक पोरं आपलं ओठ हालवतं व मी कानावर हात नेला की बाकीची फिदीफिदी करतात – त्यांना मजा वाटते म्हणून मी पण ढोंग करते”.

मला साधं वरणं खूप आवडायचे व जेव्हा फोडणी दिलेले वरणं केले असेल तेव्हा माझा थयथयाट पूर्ण वाडीला ऐकू जायचा (आता सोसायटीला ऐकू जातो)
मग हळूच मला सांगायची, “मी शेजारून तुझ्यासाठी वरण आणते थांब” पदराखालून फोडणी दिलेल्या वरणाची वाटी नेऊन चक्कर मारून परत यायची व मी मात्र मिटक्या मारीत ते वरण खायचो…. हा समजूतदार पणा चूल आणी मूल सांभाळूनच आलेला !

ह्या बाईने बहिरी असून संसार केला! – ४ मुलांना जन्म दिला व व्यवस्थित वाढवले !!
एकही वाया गेला नाही !!! हे यश त्यांचे की तीचे ? 

तीचा अजून एक किस्सा आठवतो…. माझी आई सांगते- तीच्या लहानपणी तीची आई वारली, ती जन्माने बहिरी नव्हती,(म्हणून ती बोलू शकत होती ) ८/९ वर्षांची असतांना कानात सारखी खाज येते म्हणून तीच्या आत्याने थोडे जास्त गरम तेल दोन्ही कानात टाकले ! टाकतांना ‘लहान मूल आहे – रडणारच’ म्हणून लक्ष न देता तसेंच सोडले –
जेव्हा आजीचे वडील घरी आले व तीचे रडणे थांबेना तेव्हा वैद्याकडे नेल्यावर झालेला प्रकार कळला तो पर्यंत उशीर झाला होता. पुढे आत्याचे लग्न झाले – आजीचे वडील व आजी एकटे राहायला लागले तेव्हा ती स्वयंपाक करून, घर सांभाळून विविध कला शिकली !
शाळेत जाण्याचा प्रश्नच नव्हता ! एक तर चिंचणीत शाळा नाही- पालघर लांब पडणार, न्यायला आणायला कुणी नाही त्यात ही ठार बहिरी !
…..तरी मी माझ्या लहानपणी तीला वर्तमानपत्र वाचतांना पाहिले आहे. – हे कसें शक्य झाले ह्या गोष्टींचे अजूनही नवल वाटते. नुसते मलाच नाही तर माझे सर्वांत मोठे मामा (जे आता हयांत नाहीत) त्यांनाही आठवत नाही ती वाचायला केव्हा शिकली ते !
चूल आणी मूल सांभाळणारी ठार बहिरी बाई वर्तमानपत्र वाचते हे इथल्या काही मंडळींच्या पचनी पडणार नाही !

नुसता संसार केला असता तर गोष्ट वेगळी होती….
माझे आजोबा मुंबईतल्या फोर्ट भागात स्टॅंडर्ड चाटर्ड बॅंकेत नोकरी वर होते व राहायचे गिरगांवात – डुआर्ट लेन मध्ये- डुआर्ट लेन मध्ये पिटर अल्वारीस सारखी मंडळी राहून गेलेली आहेत – आसपास बहुसंख्य ख्रिश्चन. ही बाई कधी मोडकं तोडकं इंग्रजी बोलायला शिकली देव जाणे !
हा काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा….. इंग्रज बँकेत नोकरी करणारे आजोबा नऊवारी साडीतल्या आजीला घेऊन बँकेत पार्ट्यांना जायचे –
चूल आणी मूल सांभाळलेली ही बाई तेथे कशी वावरत असेल हे चित्र डोळ्यापुढे आले की लाज वाटावी की अभिमान वाटावा हेच समजत नाही !
आम्ही शाळेत असतांनाची गोष्ट – समोरच्या मार्था आजीच्या घराचे विभाजन झाले – आम्ही भुसावळला राहायचो, आजीने मार्थाच्या मुलांना खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला होता तरी ते घडलेच. मार्था व मोठा मुलगा त्यांच्या चेंबुरच्या जुन्या घरी राहायला गेल्याचे कळले. आम्ही मुंबईत सुट्टीत आलो की, माझी आजी मला घेऊन मार्थाकडे चेंबुरला एकटी जायची.  ७० नंबरची बस दोन हत्ती सिनेमा समोरून पकडून आम्ही चेंबुरला जाऊन परत यायचो……
शाळा न शिकलेली, चिंचण गांवातली, कर्मठ भटाची बहिरी पोरं चूल आणी मूल सांभाळून हे उपद्व्याप करायचे हे काही जणांना सांगून पटणारे नाही.
तीची दोन मूलं म्हणजे माझे दोन्ही मामा चांगल्या हुद्यांवर बँकेत लागले – तेही नॅशनल ग्रिंड्लेज व स्टॅन्डर्ड चाटर्ड सारख्या, माझी एक मावशी अमेरिकेला असतें – जी इंग्लंडच्या ऑक्स्फर्ड महाविद्यालयात शिक्षण घेऊन (तेही आजोबांच्या पश्चात) अमेरिकेची नागरिक झाली.
कित्येकदा बोलवूनही अमेरिकेला न गेलेली माझी आजी तेथले फोटो जरूर मागवायची – फोटो बरोबर आलेल्या पत्रातले वर्णन वाचून वाचून ते फोटोसकट तिचे तोंडपाठ होते – आल्या गेल्याला ती अशा रितीने ते सांगायची जसें ती स्वत: त्या भागांत राहून आलेली आहे. –
चूल आणी मूल सांभाळणाऱ्या अडाणी गावंढळ बाईने मुलांना गावंढळ होवू दिले नाही ह्याचे कौतूक करावेसे वाटले म्हणून हा लेखप्रपंच !

टिप्पणी करे